देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ करण्यात आली असून, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुन्हा विस्कळीत झाले आहे. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 2.61 रुपये तर डिझेलमध्ये 2.71 रुपयांची वाढ जाहीर केली.
नव्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102 रुपयांच्या पुढे गेला असून मुंबईत पेट्रोल 111 रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलचे दरही वेगाने वाढत असल्याने वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरी आणि विविध राज्यांतील VAT कर यामुळे इंधन दरवाढीचा दबाव वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये इंधनावरील अतिरिक्त करांमुळे नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
दरम्यान, विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी “जनता महागाईने त्रस्त आहे आणि तेल कंपन्या नफा कमावत आहेत” असा आरोप करत सरकारवर निशाणा साधला.
इंधन दरवाढीमुळे आता मालवाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. सलग होत असलेल्या या वाढींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
