राज्यात अवकाळी पावसाचे संकट अद्याप कायम असून हवामान विभागाने पुन्हा एकदा अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच उन्हाच्या तडाख्यातून त्रस्त असलेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः फळबागा, भाजीपाला आणि काढणीस आलेल्या पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी घराबाहेर न पडणे, झाडाखाली थांबणे टाळणे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये आधीच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या आहेत. पुढील 48 तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून प्रशासन सतर्क झाले आहे.
