जळगाव : राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले. शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी काही ठिकाणी शासकीय वाहनांना अडवून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलकांनी प्रशासनाकडे जिल्ह्यातील किमान २५ टक्के पेट्रोल पंप शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून ट्रॅक्टर, पंप आणि शेती यंत्रांसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. डिझेल अभावी शेतीची कामे ठप्प होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा सुरू केली असून इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. विरोधकांनी मात्र सरकारवर इंधन व्यवस्थापनात अपयश आल्याचा आरोप केला आहे.
