विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने अक्षरशः विक्रमी पातळी गाठली आहे. या भीषण उष्णतेचा फटका आता वन्यजीवांनाही बसू लागला असून गडचिरोली परिसरात एका वेळी तब्बल 500 वटवाघुळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचंड उष्णता आणि पाण्याअभावी ही वटवाघुळे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. वर्धा, अमरावती, अकोला आणि चंद्रपूरमध्ये तापमान 47 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रम्हपुरी येथे 47.2°C तापमानाची नोंद झाली असून ते देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरलं आहे.
नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि भंडारा या भागांमध्येही उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी पुरेसं पाणी पिणं, दुपारी बाहेर जाणं टाळणं आणि लहान मुलं व वृद्धांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भात उष्माघाताच्या 131 घटना नोंदवल्या गेल्या असून दोन संशयित मृत्यूंची माहिती समोर आली आहे. रुग्णालयांमध्ये निर्जलीकरण, चक्कर येणे आणि उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, सतत वाढणारं तापमान, जंगलांची घट आणि हवामान बदल यामुळे वन्यजीवांवर गंभीर परिणाम होत आहेत. वटवाघुळांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
